नगर – भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्र सामानातील अग्रलेखातून सोमवारी संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या खास शैलीत संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे. आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही, अशा शब्दात विखे पाटलांनी राऊतांना टोला मारला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या उत्तराचे पत्र ट्विट केले आहे. विखे पाटील म्हणाले कि, थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. वनवासात असलेल्या विखेंची तुम्हाला अग्रलेख लिहून दखल घ्यावी लागली हेही नसे थोडके. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाला साक्षी ठेवून एवढेच सांगू इच्छितो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला, माझ्या मुलाला व आतापर्यंत माझ्या घराण्याला राजकारणात भरभरून प्रतिसाद देण्याचे काम नगर जिल्ह्यातील जनतेने केले आहे. आमची बांधिलकी त्या जनतेशी आहे आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय ते ही लपून राहिलेले नाही.
बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी त्यावेळी नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का ? आम्ही राजकीय पक्ष बदलले पण ज्या पक्षात राहिलो त्याचे निष्ठेने काम केले. आमची छाती फाडून पाहिली तर एका वेळी एकच नेता दिसेल.तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील.तुमचा हा बेगडीपणा लोकांना चांगलाच कळतो. त्यामुळेच तुम्हाला फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते हे आता लोकांना कळू लागले आहे. एकीकडे राजभवनाबाबत धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून राजभवनावर कुर्निसात करायचा हे कोलांटउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितले आहेच, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, मी भाजपमध्ये आनंदी आहे पण महाविकास आघाडी सरकारचा एक शिल्पकार असल्याच्या अविर्भावात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावास मंत्रीदेखील करू न शकल्याचे दुःख असेल आणि त्यातून आलेली कमालीची अस्वस्थता दाबून ठेवण्याचा नाहक त्रास होत असेल तर त्यात माझा काय दोष? थोरातांची कमळा असा काहीसा उल्लेख आपण अग्रलेखात केला आहे. कमळ हातात घेण्यासाठी रात्रीच्या अंधारात कोण, केव्हा, कुठे कशी चाचपणी केली होती हा एक वेगळा इतिहास आहे. ती चाचपणी यशस्वी झाली असती तर आपण केलेला उल्लेख कदाचित खरा ठरला असता. आज त्याच्या खोलात मला जायचे नाही. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि कोणी वेळेवर यू-टर्न घेतले हा इतिहास अनेकांना माहिती आहेच; मी वेगळा काय सांगावा! असे राधाकृष्ण पाटील यांनी सांगितले.
सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..! pic.twitter.com/ORqLmSN7lp
— R Vikhe Patil (@RVikhePatil) June 23, 2020
दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र सामनातून विखे पाटलांवर जोरदार टीका करण्यात आली होती. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, असे शाब्दिक फटकारे सामनाच्या अग्रलेखातून ओढण्यात आले आहेत.