मांजरी – महापालिकेत समाविष्ट असलेल्या शेवाळेवाडी गावाला पूर्वीप्रमाणे बंद नळाने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे.
महापालिका पाणीपुरवठा अधिकारी अनिरुद्ध पावसकर, सुभाष पावरा यांना तसे निवेदन देण्यात आले आहे. भैरोबा पंपिंग स्टेशनमधील मैलामिश्रित पाणी या परिसरात सोडले जायचे. त्यामुळे येथील विहिरी व बोअरवेलचे पाणी दूषित होत असल्याने शेवाळेवाडी गावाला 1965 पासून मनपाकडून पाणीपुरवठा केला जात होता.
पुढे वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतच्या वतीने विहिरी खोदून पाणीपुरवठा सुरू झाला. काही वर्षांपूर्वी मनपाने मुंढवा जॅकवेलचे दूषित पाणी जुन्या मूळा-मुठा कॅनॉलमध्ये सोडल्याने शेवाळेवाडीतील जलस्रोत पुन्हा दूषित झाले. त्यामुळे महापालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. परंतु,यामुळे पाणी चोरी वाढत आहे. शिवाय टॅंकरचे पाणी अशुद्ध असते. शिवाय, गळतीमुळे पाण्याची नासाडी होते. त्यामुळे पालिकेने पूर्वीपासूनचा (1965) च्या नियमानुसार पाणीपुरवठा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. दरम्यान, याबाबत पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले “येथील सगळ्या बाबी तपासण्यासाठी अभियंत्यांना सांगितल्या आहेत.’
आम्ही वारंवार मागणी केल्यानंतर टॅंकरने विस्कळीत, अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. यातही टॅंकर परस्पर पळवले जातात. पाणी दूषित असते. मागणीपेक्षा कमी पुरवठा होतो. त्यामुळे सन 1965 मध्ये बंद नळाने पाणीपुरवठा केला होता, तसाच आता सुरू करावा. काही जुन्या पाण्याच्या लाइनही येथे आहेत. त्याला जास्त दाबाने पाणी द्यावे. तसेच गावातही असलेल्या लाइनला पाणी देवून बंद नळाने पाणी द्यावे.
– राहुल शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप