नवी दिल्ली – राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात राजकीय लढा देण्यासाठी ऐक्य करण्याविषयी बहुतांश विरोधी पक्षांमध्ये मतैक्य दिसते. मात्र, अजूनही त्यांच्यात विसंवाद असल्याचेच सूचित होते. त्यामुळे ऐक्य करण्याची विरोधकांची इच्छा असूनही ते प्रत्यक्षात कसे घडणार याबाबत अजूनही संभ्रमाचीच स्थिती दिसते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या अलिकडील वक्तव्यांतून विरोधकांनी एकवटण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. पण, विरोधकांच्या ऐक्यासाठी अद्याप ठोस पाऊले उचलली गेल्याचे दिसत नाही. उलट, विरोधकांची तोंडं वेगवेगळ्या दिशांना असल्याचेच दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव काही काळापासून विरोधकांच्या ऐक्यासाठी प्रयत्नशील झाल्याचे जाणवते. मात्र, त्यांचे प्रयत्न स्वतंत्रपणे सुरू आहेत. त्याशिवाय, ममता आणि राव हे दोघेही कॉंग्रेसला बरोबर घेण्यास फारसे अनुकूल नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या कथित भूमिकेला पवार यांनी छेद दिला आहे.
भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत कॉंग्रेसला दूर ठेवणे योग्य ठरणार नाही, असे पवार यांनी नुकतेच म्हटले.
मागील आठवड्यात राहुल यांनी विरोधकांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. पण, त्यांचाच एक दावा विरोधकांचे ऐक्य घडवणे तारेवरची मोठी कसरत ठरणार असल्याचे सूचित करणारे ठरले. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा प्रस्ताव कॉंग्रेसने बसपला दिला होता. मात्र, बसपच्या प्रमुख मायावती यांनी साधी बोलणीही केली नाही, असे राहुल यांनी म्हटले.
येचुरी यांनी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र आणून संयुक्त आघाडी स्थापण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. ती आघाडी प्रत्यक्षात आकाराला येईल किंवा परस्पर सामंजस्यातून राज्याराज्यांत उभी राहील, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे एकजुटीची रूपरेषा ठरवताना विरोधकांना प्रचंड राजकीय कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट होते.
द्रमुकचा कॉंग्रेसला बरोबर घेऊन विरोधकांची आघाडी स्थापण्याला हिरवा कंदील असल्याचे दिसते. मात्र, अजून बऱ्याच विरोधी पक्षांनी ऐक्याविषयी ठाम भूमिका घेतल्याचे दिसत नाही. बिहारमध्ये काही काळापासून कॉंग्रेस आणि राजद मित्रपक्षांच्या भूमिकेत आहेत. पण, काही दिवसांपासून त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे जाणवते. पुढील काळात आप हा देशातील महत्वाचा पक्ष बनण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्या पक्षानेही अद्याप विरोधकांबरोबर जाणार की नाही याविषयीचे पत्ते खोललेले नाहीत. ते सगळे पाहता खरोखरीच मनोमिलन घडवण्यासाठी विरोधकांना अनेक पाऊले उचलून बरेच अंतर चालून जावे लागणार असल्याचेच दिसते.