मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडण्यास सुरवात केली आहे. देशातील बड्या उद्योजकांनी थकवलेले बँकेचे पैसे भरणाऱ्या भाजप सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.
भाजपा सरकारने कर्ज थकवणाऱ्या बँकांची परिस्थिती सुधारण्यासाठी ८५ हजार कोटी रुपयांची मदत केली. मग कर्जात बुडालेल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारचे हात तोकडे का पडत आहेत?, असा प्रश्न राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीने म्हटले कि, पाच वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रश्नांकडे सर्रास दुर्लक्ष केले, परिणामी बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकरी आत्महत्या या प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली आहे.