नागवडे, नाहाटा, गिरमकर, दरेकर, लगडांच्या गावांत शेलार पुढे
समीरण नागवडे
श्रीगोंदा – विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या मागे आपली ताकद उभी करणाऱ्या तालुक्यातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांच्या गावांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार यांना मताधिक्य मिळाले आहे.यामुळे या नेत्यांची मतदारांनी स्वतःच्या गावात चांगलीच कोंडी केली आहे.
भाजपचे उमेदवार असलेल्या बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावाने त्यांना 4 हजार 210 मतांची निर्णायक आघाडी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर “नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडत भाजपवासी झाले. त्यामुळे त्यांचे गाव असलेल्या वांगदरीमधून भाजप उमेदवार पाचपुतेंना पहिल्यांदाच मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती. परंतु नागवडेंच्या वांगदरीमध्ये अनपेक्षितरित्या शेलार यांना 48 मतांची आघाडी मिळाली. शेलारांना मिळालेली आघाडी कमी असली तरी नागवडेंची गोची करणारी नक्कीच आहे. पाचपुते समर्थक असलेले पं. स.चे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या कोळगावात शेलारांना 358 मतांची आघाडी मिळाली आहे.
खासदार सुजय विखे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, दत्तात्रय पानसरे यांनी पाचपुतेंशी जवळीक साधली. तर नगरपालिका निवडणुकीत प्रा. तुकाराम दरेकर यांनी पाचपुतेंशी जुळवून घेतले. या चार नेत्यांपैकी पानसरे वगळता नाहाटा, गिरमकर आणि दरेकर या तिन्ही भाजप नेत्यांच्या गावांमध्ये राष्ट्रवादीच्या शेलारांना आघाडी मिळाली आहे.
बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या लोणीव्यंकनाथ गावामध्ये पाचपुते यांना मताधिक्य मिळण्याऐवजी शेलार यांना 27 मतांची आघाडी आहे. प्रा. तुकाराम दरेकर, मिलिंद दरेकर आणि प्रशांत दरेकर हे तिघे भाजपमध्ये असताना त्यांच्या हिरडगावातून शेलार यांना 164 मतांची आघाडी मिळाली आहे. जि. प.चे माजी सभापती बाळासाहेब गिरमकर यांच्या अजनुज या गावात शेलारांनी 405 मतांची आघाडी घेतली आहे.
बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, संचालक लक्ष्मण नलगे हे भाजपमध्ये असताना त्यांच्या सांगवी दुमाला या गावातून शेलारांना 168 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे या भाजपच्या नेत्यांनी आपल्या गावात काम केले नाही. तसेच त्यांचा प्रभाव आपल्या गावात राहिला की नाही याबाबत प्रश्न चिन्ह उभे राहत आहे.