सातारा (प्रतिनिधी) – ऋतू बदलताना होणारा सर्दी-खोकला सातारकरांना परिचयाचा आहे. मात्र सध्या कोरड्या खोकल्याची साथ पसरत असून, त्यासाठी विषाणूंपेक्षाही प्रदूषण जबाबदार असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञ करत आहेत. तापमान कमी झाल्याने हवेतील प्रदूषित घटक वातावरणाच्या खालच्या थरातच अडकून राहत आहेत. हे धूलिकण श्वसनमार्गात गेल्याने होणारा कोरडा खोकला बरा होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागत आहेत. साताऱ्यात पावसाच्या आगमनापूर्वी ग्रेड सेपरेटर व रस्त्याच्या खणाखणीमुळे जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात एकूण 173 पेशंट ऍडमिट झाले. घशात खवखव, सतत खोकला, अंगात बारीक तापाच्या तक्रारी अलीकडच्या गेल्या तीन आठवड्यात वाढल्या आहेत.
दिवसा तापमान वाढल्यानंतर हवेचा जमिनीलगतचा थर वर जातो आणि त्यासोबत प्रदूषित घटकांचे प्रमाणही कमी होते. थंडीच्या दिवसात मात्र जमिनीलगतची हवा तिथेच अडकते व हवेतील धूर, धूलिकण श्वसनावाटे शरीरात जातात. त्यामुळे घसा खवखवणे, कोरडा खोकला असे त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऋतू बदलताना विषाणूंमुळे येणारा खोकला व थंडीतील खोकला यात फरक आहे. थंडीतील खोकला हा श्वसनमार्गिका कोरडा झाल्यामुळे होतो. त्यातच प्रदूषणामुळे या खोकल्याची तीव्रता वाढते. विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य खोकल्यात तापही येतो तसेच कफ होतो. हा खोकला तीन-चार दिवसांत बरा होतो. मात्र धूळ, परागकण यामुळे होत असलेल्या खोकल्यात क्वचित एखाद् दिवस बारीक ताप येतो. त्यानंतर कोरडा खोकला पंधरा ते वीस दिवस राहतो, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. भगवान पितळे यांनी सांगितले.
साताऱ्याच्या हवेत सध्या सहा मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाच्या धूलिकणांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शरीराच्या संरचनेमुळे 10 मायक्रोमीटरपेक्षा आकाराने मोठे असलेले धूलिकण शरीरात प्रवेश करू शकत नाही. मात्र 2.5 ते 5 मायक्रोमीटपर्यंतचे कण नाक, कान, घसा, स्वरयंत्र यांना अपाय करतात. खोकला, सर्दी, शिंका यासोबतच डोळ्यांची आगही होते. 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे धूलिकण थेट फुप्फुसात प्रवेश करून तेथे जमा होण्याचीही शक्यता असते. यामुळे दमा, ब्रोन्कायटिसपासून कर्करोगही होतो. या सर्वाचा विचार करता साताऱ्याच्या हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी तातडीने उपायायोजना करण्याची गरज असल्याचे पत्र नगरविकास विभागाला काही सतर्क सातारकरांनी लिहिले आहे. साताऱ्यात उखडलेल्या रस्त्यांची धूळ रस्त्यावर कमी आमच्या शरिरात जास्त असल्याची तक्रार पत्रात करण्यात आली आहे.
पावसाळी हवेमुळे कफ दमवतोय नागरिकांना
सातारा शहर व परिसरात सातत्याने पावसाची रिपरिप सुरू आहे. अचानक पाऊस उघडीप घेऊन उनही पडत आहे. सकाळी पावसाळी हवा दुपारी गरमाई रात्री वाढता गारठा अशा विचित्र हवामानाचा अनुभव सातारकर घेत आहेत. त्यामुळे खोकला, ताप, सर्दी इ रोगांच्या तक्रारी वाढल्या आहेत. असे असतानाच दुसरीकडे हवेतील वाढलेला गारठा तर कधी उष्णता अशा दुहेरी बदलांमुळे घशाला संसर्ग, छातीत कफ साचणे, सर्दीचा खोकला यासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. रूग्णांनी शक्यतो उबदार वातावरणात राहून विषाणूंचा संसर्ग टाळावा, असे आवाहन ज्येष्ठ छातीतज्ञ डॉ. अमोल शिंदे यांनी केले आहे.