नवी दिल्ली -अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे खासदार तापीर गाओ यांनी चिनी घुसखोरीबाबत केलेल्या दाव्यावरून कॉंग्रेसने बुधवारी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गाओ यांचा दावा खरा आहे की खोटा, असा सवाल करत कॉंग्रेसने स्पष्टीकरण देण्याची मागणी सरकारकडे केली.
लडाखच्या गलवान खोऱ्यात काही दिवसांपूर्वी भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण असतानाच गाओ यांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अरुणाचलमधील काही भाग चीनने बळकावल्याचा धक्कादायक दावा केला. त्यावरून मोदी सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी पुढे सरसावले.
गाओ यांच्या दाव्यामागील सत्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सांगावे. भारतीय हद्दीत चिनी घुसखोरीचे वृत्त पुढे आल्यावर ते फेटाळण्यासाठी सरकार पुढे येते, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. कॉंग्रेसचे आणखी एक प्रवक्ते गौरव गोगोई यांनीही प्रतिक्रिया दिली. भारताने चीनला ठोस प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. नियमित चर्चेचा उपयोग होणार नाही, असे त्यांनी म्हटले.