जयपूर: राजस्थानामध्ये राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी राजस्थानातील कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रुपयांचे आमिष भाजपकडून दाखवले जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.
मध्यप्रदेशात भाजपने ज्या प्रकारे कमलनाथ यांचे सरकार उलथवून टाकले होते. त्याच प्रमाणे राजस्थानातील सरकारही उलटवून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी कॉंग्रेसच्या काही आमदारांना 25 कोटी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे. त्यापैकी 10 कोटी रुपये दिले गेलेही असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला.
बुधवारी रात्री गेहलोत यांनी हा गौप्यस्फोट केला. भाजपकडून आमदारांच्या फोडाफोडीचे संभाव्य प्रयत्न लक्षात घेऊन कॉंग्रेसने आपल्या 107 आमदारांसह 13 अपक्षांना बैठकीसाठी जयपूरजवळच्या एका रिसॉर्टवर नेऊन ठेवण्यात आले आहे. राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी 19 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली गेली आहे.
या रिसॉर्टवर 120 आमदारांना हलवले जाणार आहेत. एकाचवेळी 13 अपक्ष आमदारांनी कोणत्याही पद अथवा पैशाची मागणी न करता कॉंग्रेसला पाठिंबा दिलेले राजस्थान हे देशातील एकमेव राज्य असल्याचेही गेहलोत यांनी सांगितले.
आमदारांच्या खरेदीचा प्रयत्न सुरू असल्याची तक्रार कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे.