कामारेड्डी – ग्रामीण भागात वीज बिल एक हजार रुपये आले तरी लोकांना आश्चर्य वाटते. ज्या घरात पाचशे रुपायांपर्यंत वीजबिल यायला पाहिजे होते तिथे तब्बल 7 लाख रुपये वीज बिल पाहून कुटुंबाला “करंट’ लागला. तेलंगणा राज्यातील कामारेड्डी या जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाला या अनपेक्षित घटनेने धक्का बसला.
जिल्ह्यातील इसरोजीवाडा या गावातील गांड्ला श्रीनिवास यांच्या घरात तीन बल्ब आणि एक पंखा आहे. याशिवाय विजेवर चालणारी एकही वस्तू या कुटुंबाकडे नाही. फेब्रुवारी महिन्याचे पाचशे रुपये वीजबिल त्यांनी भरले होते. मात्र करोना आणि लॉकडाऊनमध्ये मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांचे वीजबिल भरले नव्हते. या तीन महिन्यांचे वीजबिल एकत्र करून वीज विभागाने 7 लाख 29 हजार 417 रुपयांचे बिल दिले. आता हे शेतकरी कुटुंब या चिंतेत आहे की, एवढे वीजबिल आले कसे आणि ते भरायचे तरी कसे?
याच प्रकारे एका मोबाइल शॉपला 12 लाखांचे वीजबिल आले आहे. खरे तर लॉकडाऊन काळात हे शॉप बंद होते, तरी एवढे बिल कसे आले, हा प्रश्नच आहे. तर काही लोकांना केवळ शंभर रुपये बिल आले आहेत. याविषयी वीज विभागाला विचारण्यात आले असता अधिकाऱ्यांनी काहीतरी चूक झाल्याचे मान्य केले आहे.