मुंबई, – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून नंतर तो मागे घेणाऱ्या रेणू शर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केल्याने राजकीय वर्तुळातआश्चर्य व्यक्त होत आहे. वाघ यांनी मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन ही मागणी केली.
या भेटीचा तपशील त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हे प्रकरण धनंजय मुंडे – रेणू शर्मा या दोघांपुरते मर्यादित नसून यात योग्य कारवाई झाली नाही, तर याचे दूरगामी परिणाम राज्यातील लेकी-बाळींना भोगावे लागतील. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई व्हावी, असे ट्विट त्यांनी नांगरे यांच्या सोबतच्या छायाछित्रांच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोप धक्कादायक होता. पण, ज्या पद्धतीने तक्रार मागे घेतली गेली, तेदेखील तितकेच धक्कादायक आहे, असे त्या यापुर्वी म्हणाल्या होत्या.
रेणू शर्मा हिने बलात्कारासारखा गंभीर आरोप करुन नंतर तक्रार मागे घेतल्यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. अशा परिस्थितीत खोटे आरोप केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रेणू शर्मांवर तात्काळ कारवाई करायला हवी. खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळे राजकीय कार्यकर्ता असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, तो उद्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खोटे आरोप लावणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ कारवाई करावी, असे मत चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्टद्वारे आधीच केली होती.