बालिया – भारतीय जनता पक्षाचे नेते हे सध्या मोठ्या उद्योगपतींचे चौकीदार म्हणूून काम करीत आहेत, असा आरोप सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष हा आता भारतीय झुट पार्टी झाला आहे असा घणाघातही त्यांनी केला आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपच्या लोकांना शेतकरी हिताची जराही चिंता नाही. त्यांना केवळ अदानी अणि अंबानीचीच चौकीदारी करण्यात धन्यता वाटते आहे. देशातील कमजोर घटकांना कोविड उपाययोजनांच्या नावाखाली आणखी कमजोर आणि गरीब केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले की, देशात जेव्हा निवडणुका असतात त्यावेळी त्यांना कोठेही करोनाची भीती वाटत नसते आणि त्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रचारसभा घेऊन बिनदिक्कत गर्दी केली जाते पण गोरगरिबांच्या व्यवहारावर मात्र करोना नियंत्रणाचा बडगा सध्या उगारला जातो आहे, असेही राजभर यांनी म्हटले आहे.
करोना नावाच्या रोगावर आमचा विश्वासच नाही, देशात थंडी ताप हे नेहमीचेच आजार आहेत अशी टिप्पणीही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केली.