नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी तीन कृषीविषयक कायद्यातील अडचणींच्या संबंधात सरकारशी चर्चा करण्यास पुढे यावे सरकार त्यांच्या अनुकूल सर्व दुरुस्त्या करण्यात तयार आहे, असे केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की आंदोलन करणारे शेतकरी ही आमचीच माणसे आहेत, आंदोलन करणारे सारे लोक शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत आणि त्यांच्याविषयी आम्हाला सन्मानच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
द्वारका येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले की, जे शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येईल ते मोदी सरकार कधीही त्यांच्यावर लादणार नाही.
शेतकऱ्यांनी एक प्रयोग म्हणून या तीन नव्या कृषी कायद्याचा स्वीकार करावा, जर हे कायदे शेतकरी हिताचे नाहीत असे आढळून आले तर त्यात सर्व शक्य ते बदल केले जातील, अशी ग्वाहीही राजनाथसिंह यांनी दिली.
पहिली एक-दोन वर्षे हा कायदा अंमलात आणून पाहू, त्याचे नेमके काय परिणाम होतात ते आपण सगळेच तपासून पाहू त्यानंतर जर ते शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येत असल्याचे दिसून आल्यास त्यात आवश्यक ते फेरबदल करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सर्व समस्या चर्चेच्या माध्यमातून सुटू शकतात, त्यामुळे ही चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवण्याची सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे आणि त्यामुळेच आम्ही पुन्हा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन करीत आहोत, असेहीं राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.