मुंबई -पुण्यात झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल, असे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.अजित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरतील का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पुढे अजित पवार म्हणाले की मी 2024 ची वाट कशाला बघू आतादेखील राज्याचा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोन्हीसोबत मी काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत वरिष्ठांनी सांगितले म्हणून काम केले, असेही त्यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. पण प्रत्येकवेळी एकतर आमच्या जागा कमी आल्या किंवा मुख्यमंत्रिपदाची संधी असताना वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय झाला आणि ती संधी गमावली, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
दरम्यान यावर आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते पुढे म्हणाले, ‘ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही. या राजकारणातल्या घटना आहेत.’
अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगणं, ही वेगळी गोष्ट आहे आणि बहुमत असणं, ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे अजित पवार बहुमताच्या बाजुने आले किंवा कदाचित १०-२० वर्षांनी त्यांना बहुमत मिळालं, तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. माझा त्यांना विरोध नाही. ते चांगले कार्यकर्ते आहेत. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे-जे वक्तव्यं करतात, त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.” असेही ते म्हणाले आहे.