मुंबई – देशासमोर करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे संकट उभे ठाकले आहे. विषाणू संसर्गाचा वेग हाताबाहेर जात असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आलेत.
विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय उपयुक्त ठरत असला तरी यामुळे अर्थचक्र मात्र पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आज भाजप नेते निलेश राणे यांनी पुण्यातील लॉकडाउनवरून पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुण्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर शहरातील रुग्णसंख्येचा आलेख खाली घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “लॉकडाऊन लावताना त्रास झाला मात्र यामुळे पुण्यात रुग्णसंख्या आटोक्यात आली, असं केंद्राचे अधिकारीच सांगतात” असं वक्तव्य केलं होत.
त्यांच्या या वक्तव्यावर निशाणा साधताना निलेश राणे यांनी, ‘अजित पवारांना स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची हे चांगल्याने जमत’ असं वक्तव्य केलं.
याबाबत राणे यांनी ट्विट करत, “अजित पवारांना हे बरं जमतं स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. पुण्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की दहा वर्ष उठणार नाही. लोकांनी विचार करावा या मंडळींचे साखर कारखाने सॅनिटायझर बनवायचं कारण देऊन चालू राहिले, अख्या लॉकडाऊन मध्ये साखर कारखाने एकही दिवस बंद नाही.” असा हल्लाबोल केला.