मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नारायण राणे यांनी आज सरकारच्या भवितव्याबाबत मोठं भाकीत केलंय. ‘राज्यात ठाकरे सरकारचे दिवाळीनंतर फटाके वाजतील’ असं नारायण राणे म्हणालेत. एबीपी माझा या नामांकित वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.
“लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असंही ते म्हणाले.
“नितीश कुमारांनी शरद पवारांच्या सल्ल्याने बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा”
सरकारच्या फटाक्यांवर निर्बंध लादण्याच्या निर्णयावर ताशेरे
यावेळी फटाके फोडण्यावर लावलेल्या निर्बंधावरुन राणे यांनी ठरे सरकारवर टीका केली. “दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा मी नाही. सण साजरे करण्यात तुम्ही व्यत्यय आणता. सगळीच लहान मुलं, मोठे लोक फटाके वाजवून आनंद लुटतात. तोदेखील तुम्ही घेऊ देत नाही. फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे,”
मुख्यमंत्रीदाला शोभणारं एकही काम नाही
राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टाका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्रीदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही. पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्यापलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. राज्याचा त्यांना अभ्यास नाही. ठाकरे कुटुंबीयांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती. मातोश्रीवर देवाण घेवाण करुन व्यवहार होतात. आमदार, खासदारांना काही स्थान नाही,”
“अर्णव यांना जामीन देत सर्वोच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सणसणीत चपराक”
भाजपा केवढा मोठा पक्ष आणि शिवसेना कुठे…
राणे यांनी भाजपवर वारंवार टीकास्त्र डागणाऱ्या शिवसेनेला सल्ला देताना, “शिवसेना शब्द पाळते असं मला वाटत नाही. भाजपासोबत युती असताना दिलेले शब्द कुठे पाळले, गद्दारी का केली मग? भाजपा केवढा मोठा पक्ष आणि शिवसेना कुठे. बिहारमध्ये शिवसेनेची काय दैना झाली..एकाचं तरी डिपॉझिट वाचवू शकले का? भाजपासोबत शिवसेनेने कोणतीही बरोबरी करु नये. महाराष्ट्र सोडून कुठेही त्यांची चांगली स्थिती नाही. महाराष्ट्रात दे ५६ आले त्यासाठी भाजपाच कारणीभूत आहे. बिहारमध्ये उमेदवार उभे केले, ५० जणांचं डिपॉझिट जप्त झालं याची लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने टीका करणं आता बंद करावं,” असं सांगितलं.
नितीश कुमार विश्वासू आणि कर्तबगार
यावेळी राणे यांनी नितीश कुमार यांच्याबाबत मत व्यक्त करताना, “नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री झाले आहेत. ते विश्वासू आणि कर्तबगार आहेत. त्यांच्यावर विश्वास टाकला आहे हे चुकीचं म्हणणार नाही. योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर बसवलं आहे,” असे सांगितले.