नवी दिल्ली : शाहीनबाग प्रकरणात सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा नेते कपील मिश्रा पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक ट्विट केले आहे.
पहिल्यांदा त्यांनी आमची वाहतूक रोखली. आम्हाला शाळेत, रुग्णालयात आणि कामावर जाण्यापासून रोखले, शाहीनबाग आंदोलक आता आत्मघाती दहशतवाद्यासारखे वागत आहेत. शाहीनबाग निदर्शक आता लाखो दिल्लीकरांच्या जीवासाठी थेट धोका आहेत. हे एक गुन्हेगारी कृत्य आहे. # कोरोना, असे ट्विट त्यांनी केले आहे.
कोरोनाच्या साथीॅमुळे दिल्लीत 50 पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास दिल्ली सरकारने मनाई केली आहे. तर केंद्र सरकारने जनतेने एकत्र येऊ नये म्हणून आवाहन केले आहे. मात्र तरीही शाहीनबागेतील निदर्शक मागे हटण्यास तयार नाहीत. कोरोनामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.