नवी दिल्ली – भारतीय संघाला विजयी करणे तसेच कठीण परिस्थितीत असलेला सामना संघासाठी वाचविणे याचसाठी मी फलंदाजी करतो, केवळ लोकांचे मनोरंजन करण्यासाठी तसेच नेटकऱ्यांना आनंद मिळावा यासाठी मी फलंदाजी करत नाही अशा शब्दांत चेतेश्वर पुजाराने ट्रोलर्सला परखड उत्तर दिले आहे.
न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाला एकदिवसीय तसेच कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. कसोटी मालिकेत पुजाराच्या संथ फलंदाजीवर खुद्द कर्णधार विराट कोहलीनेही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सोशल मीडियावर देखील टोलर्सनी पुजाराला लक्ष्य केले होते, त्यावर पुजाराने आपली मते परखडपणे मांडली आहेत.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत पुजाराने पहिल्या डावात 42 चेंडूंत 11 धावा केल्या तर, दुसऱ्या डावात 81 चेंडूत 11 धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीत पुजाराने पहिल्या डावात तब्बल 140 चेंडू खेळताना 54 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने 24 धावा करताना 88 चेंडू घेतले होते. या संथ खेळीवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पुजाराला चांगलेच ट्रोल केले होते. यावर प्रथमच पुजाराने मौन सोडताना ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
रणजी करंडक स्पर्धेत पुजाराच्या सौराष्ट्र संघाने प्रथमच विजेतेपदाचा मान मिळविला. या सामन्यात बंगालविरुद्ध पहिल्या डावात पुजाराने तब्बल 237 चेंडू खेळताना 66 धावा केल्या होत्या, त्यावरही तो ट्रोल झाला होता. संघाची स्थिती चांगली व्हावी तसेच सामना जिंकण्यात माझे योगदान असावे यासाठी मी सामन्याची स्थिती पाहुन कसा खेळ करायचा ते ठरवतो. मी सोशल मीडियासाठी तसेच कोणाचे मनोरंजन करण्यासाठी फलंदाजी करत नाही, असेही पुजाराने सांगितले.