उदयपुर – कॉंग्रेस संघटनेत फेरबदल करण्याच्या संबंधात चर्चा करण्यासाठी पक्षातर्फे निवडक प्रतिनिधींसमवेत येथे तीन दिवसांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणाने झाले. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
त्या म्हणाल्या की भाजप देशातील जनतेला दहशतीच्या सावटाखाली ठेवत आहे.भाजपने मिनीमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्सचा नारा दिला होता. पण त्याचा नेमका अर्थ आता लोकांच्या ध्यानात येऊ लागला आहे. त्यांनी अल्पसंख्याकांवर देशात क्रुर अत्याचार चालवले असल्याचाही आरोप केला.
पक्षाच्या सध्याच्या स्थितीबाबत आणि भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य करताना त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसने आत्तापर्यंत आपल्याला खूप काही दिले आहे. आता पक्षाचे ऋण चुकवण्याची वेळ आली आहे. पुन्हा नव्याने सिद्ध होऊन कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप आणि संघ परिवाराने आज देशापुढे जी आव्हाने निर्माण केली आहेत त्याच्या विरोधात लढण्यासाठी योग्य धोरण आता पक्षाने स्वीकारले पाहिजे. त्यावर विचार करण्याची संधी या नव चिंतन शिबीराने दिली आहे. आपण सगळ्यांनीच आता व्यक्तीगत स्तरावर आणि पक्षाच्या स्तरावर चिंतन आणि आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आपण व्यापक प्रयत्नांतूनच मोठा बदल घडवू शकतो. हे करताना आपल्याला व्यक्तिगत आकांक्षाना दूर ठेवावे लागेल. पक्षाने आत्तापर्यंत आपल्याला खूप काही दिले आहे आता पक्षाचे कर्ज चुकवण्याची वेळ आली आहे असे आवाहन त्यांनी आज पुन्हा एकदा केले. त्या म्हणाल्या की या शिबीराला उपस्थित असणाऱ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी खुल्या दिलाने पक्षापुढील आव्हांनावर चर्चा करावी आणि आपले प्रस्ताव सुचवावेत. पण हे करीत असतना पक्ष मजबुतीने उभा आहे हे चित्रही लोकांपुढे ठसवले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेतच राहुल गांधी, प्रियंका गांधी हेहीं या शिबीराला उपस्थित आहेत. पक्षाच्या या शिबीराचा समारोप राहुल गांधींच्या भाषणाने होणार आहे.