पुणे – सिंहगड किल्ल्यावरून प्रवाशांना खाली घेऊन येणारी बस चालकाला अंदाज न आल्याने सुरक्षा कठडयाला धडकली. यावेऴी, बस मध्ये जवळपास 27 ते 28 प्रवासी होते. चालकाने वेळीच बस नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या प्रकारामुळे पीएमपीच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. ही सेवा सुरू करण्यात आल्यापासून बसची संख्या, वेळापत्रक तसेच चढावरती इ-बस थांबत असल्याने प्रवाशांनाच खाली उतरून बसला धक्का मारावा लागत आहे. त्यातच, आता हा अपघात घडल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे ज्या ठिकाणी बस धडकली त्या पलिकडे मोठी दरी होती. त्यामुळे बसवर नियंत्रण नसते मिळाले तर मोठा अपघातही घडू शकला असता.
पीएमपी आणि वनविभागाकडून 1 मे पासून सिंहगडावर ई-बस सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना खासगी वाहने घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना ई- बसचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र,घाट रस्त्यावर मोठया प्रमाणात वळणे असल्याने तसेच चढ असल्याने या बसेस मध्येच उतराला मागे येत आहेत. तसेच घाट रस्त्यावर त्या वळवितानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे, लहान बसेस द्याव्यात अशी मागणी केली जात आहे. तसेच, शनिवार-रविवारी पर्यंटकांची संख्या जास्त असल्याने गाडया वाढविण्याची मागणीही केली जात आहे. त्यामुळे या सेवेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याने शुक्रवारी झालेल्या प्रकाराने आणखी गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे.
उतरावर घडली दुर्घटना
दरम्यान, प्रवाशांना घेऊन येणारी ही बस गडावरून खाली येत होती. उतरावर या बसचा वेग अधिक असतो. तसेच रस्ता छोटा असल्याने चालकांना वळणाचा अंदाज येत नाही. या रस्त्यावर असलेले कठडे दगडाचे असले तरी बसच्या कोपऱ्याच्या धडकेने ते पडले आहेत. मात्र, कठडा पडलेला भाग पलिकडे पाहता खोल दरी असून हा भाग धडकी भरविणारा आहे. ही घटना चालकाना अंदाज न आल्याने घडली असल्याचे पीएमपीकडून सांगण्यात येत असले तरी ही धोक्याची घंटा असून प्रवासी सुरक्षेसाठी अधिक कडक पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.