दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भाजप टीका
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. कॉंग्रेस, भाजपा आणि आप या तीन पक्षांमध्ये दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. पण मुख्य लढत भाजपा आणि आप यांच्यामध्ये असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सामनामधून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामाची स्तुती करण्यात आली आहे. तर भाजपावर टीकेची झोड उडवली आहे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत. असे म्हणत सामनातून केजरीवाल यांच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे.
दिल्लीत कॉंग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भाजपा सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या फुलोत्पादनाला आमच्या शुभेच्छा! असे म्हणत भाजपावर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडताना दिसत आहेत, असेही लेखात म्हटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी जिवाची बाजी लावली आहे. महाराष्ट्र हातचे गेले, झारखंडमध्ये दारुण पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत तरी झेंडा फडकवावा, असे भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर त्यात चुकीचे काय? दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठी देशभरातले 200 खासदार, भाजपचे सर्व मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ कामाला लागले आहे, पण इतके करूनही एक केजरीवाल सगळ्यांना भारी असे चित्र स्पष्ट झाले आहे.
केजरीवाल यांच्या भूमिका, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी मतभेद असू शकतात, पण हाती मर्यादित सत्ता असताना, केंद्राने वारंवार अडथळे आणूनही आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा याबाबतीत त्यांच्या सरकारचे काम आदर्श आहे. केजरीवाल सरकारच्या त्या कार्याचा आदर्श घेऊन पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने हे दिल्ली मॉडेल इतर राज्यांत राबवायला हरकत नव्हती व त्या कामी केजरीवाल यांच्या व्हिजनचा वापर देशभर करायला हवा होता, पण प्रचारातील एकतर्फी झोडपेगिरी आणि उटपटांगगिरी इतक्या थराला पोहोचली की इतर विषय राहिले बाजूला, केजरीवाल यांनाच खोटे ठरविण्यासाठी सारी यंत्रणा राबवली जात आहे. एखाद्या राज्यात कुणी चांगले काम करीत असेल व ते राज्य आपल्या विचाराचे नसेल तरीही चांगल्याला चांगले म्हणणे व ते चांगले काम पुढे घेऊन जाणे हेच देशाच्या लोकनायकाचे कर्तव्य असते. पण ही मनाची दिलदारी आज उरलीय कुठे? दिल्लीची राजकीय व्यवस्था ही केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. दिल्लीतील महानगरपालिका भाजपच्या मुठीत आहे. केंद्राच्या वतीने नायब राज्यपाल दिल्लीचा कारभार पाहतात. म्हणजे लोकनियुक्त सरकारला टपल्या मारतात. अशा परिस्थितीत एखादे सरकार काम करते व नागरी सुविधांच्या बाबतीत कीर्तिमान प्रस्थापित करते हे महत्त्वाचे.
आमचे राज्यकर्ते अमेरिका, फ्रान्स, युरोपादी राष्ट्रांतील एखाद्या व्यवस्थेने प्रभावित होऊन ते मॉडेल हिंदुस्थानात राबवतील, त्याचा डांगोरा पिटतील, पण दिल्लीतील सरकारी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या याचे कौतुक करताना त्यांच्या पोटात सर्जिकल स्ट्राइकचा गोळा का उठावा तेच कळत नाही. गरीबांची पोरं दिल्लीतील सरकारी शाळांत शिकतात व त्या शाळा आदर्श ठरल्या. मोहल्ला क्लिनिक योजना उत्तम काम करतात. पाणी, वीज बिले माफ झाली किंवा अर्ध्यावर आली याचा अर्थ पाच वर्षांपूर्वी केजरीवाल यांनी जी वचने दिली ती पूर्ण झाली व त्याबद्दल श्री. मोदी किंवा श्री. शहा यांनी केंद्रीय सरकारतर्फे केजरीवाल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कारच करून नवा पायंडा पाडायला हवा. पण ते न करता भाजपचे बडे नेते व मंत्री दिल्लीत निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू विरुद्ध मुसलमान असा राजकीय चिखल तुडवीत बसले आहेत.