मुंबई : सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने 50-50 फॉर्म्युल्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकार स्थापन करण्यासाठी निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी भाजपचे दिल्लीतील नेते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी बुधवारी येथे दिली. भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेला तणाव येत्या दोन-तीन दिवसात निवळेल, असेही त्यांनी सांगितले.
आज विधानभवनात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी नेता निवडीनंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी पुढील रणनीती ठरविणार असल्याची माहिती दिली. ही रणनीती ठरविण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सहभाग असेल. सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाबाबत उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही महाजन म्हणाले.
काहीही झाले तरी राज्यात शिवसेना, भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन होईल, असेही त्यांनी सांगितले. सरकार एकट्या भाजपचे नसून महायुतीचे असल्याने कोणाला कोणती खाती द्यायची तसेच प्रत्येकाचे म्हणणे काय आहे, मागण्या काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी दोन ते दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे ते म्हणाले.