जनमत चाचणीचा कौल ः महायुती झाल्यास 205 जागा
मुंबई- निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह हरयाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र, त्यापूर्वी जनमताचा कल “एबीपी माझा’-“सी व्होटर’च्या ताज्या सर्वेक्षणात समोर आला आहे. त्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भाजपला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होताना दिसते. विशेष म्हणजे भाजप यंदा 144 जागांसह स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत आहे.
दुसरीकडे शिवसेनेसाठी सर्वेक्षणाचे कल चिंता वाढवणारे आहेत. गेल्या खेपेस स्वबळावर 63 जागा मिळवणारी शिवसेना यंदाही वेगळी लढल्यास फक्त 39 जागा मिळवेल असे दिसत आहे. मात्र, महायुती झाल्यास शिवसेनेलाही लाभ मिळून 205 जागांसह भाजप-सेना सहज सत्तास्थापन करू शकतील. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला मात्र यंदाही जनता विरोधी बाकांवर बसवणार असल्याचे चित्र आहे.
स्वतंत्र लढल्यास –
भाजप – 144
शिवसेना – 39
कॉंग्रेस – 21
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 20
मनसे – 00
इतर – 64
महायुती आणि महाआघाडी झाल्यास
महायुती – 205
महाआघाडी – 55
इतर – 28
वंचितचा पुन्हा “दे धक्का’?
पुढचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब आंबेडकर असतील, या शब्दांत खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच गांभीर्याने घेतलेली ऍड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आश्चर्याचे धक्के देऊ शकते. युत्या-आघाड्यांची गणित जमली किंवा फिस्कटली तरी वंचित आघाडी यंदा विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास तब्बल 64 जागा अन्य पक्षांना मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.