लखनौ – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपवर त्यांच्या उत्तर प्रदेश निवडणूक जाहीरनाम्यात कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या घोषणांचीच नक्कल केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,आमच्याच जाहीरनाम्यातील बहुतांश मुद्दे भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात केवळ कॉपी-पेस्ट केले आहेत.
भाजपने मंगळवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. त्यात सिंचनासाठी मोफत वीज, प्रत्येक घरासाठी नोकरी, विद्यार्थिंनींना स्कुटी, विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन आणि ज्येष्ठ महिलांसाठी मोफत प्रवासाचे आश्वासन दिले आहे.
लव्ह जिहाद प्रकरणात दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्याचे आश्वासनही भाजपने दिले आहे. प्रियंकांनी म्हटले आहे की, भाजपने आपल्या ‘घोषणा पत्र’ला ‘धोका पत्र’ असे नाव द्यावे. गेल्या 70 वर्षांच्या चर्चेचा वापर करणाऱ्या भाजपला गेल्या पाच वर्षांत स्वताच्या पक्षाच्या जाहीरनाम्यातील एक चतुर्थांश आश्वासनेही पूर्ण करता आली नाहीत,असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात ना पाच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आहे, ना भविष्य घडवण्याचे व्हिजन आहे असेही त्यांनी म्हटले आहे.