जलपायगुडी – पश्चिम बंगाल मधील जलपायगुडी येथे भाजप आणि तृणमुल कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर तेथील भाजप कार्यकर्त्यांच्या घरांना आगी लावणे किंवा त्यांची मोडतोड करण्याचे प्रकार घडले आहेत. किमान सात घरांना आगी लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तृणमुल कॉंग्रेसचे स्थानिक नेते भोमबोल घोष यांच्यावर हुसलूरदंगा मार्केट मध्ये 14 फेब्रुवारीला हल्ला झाला होता. त्यांचे काल शनिवारी खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा तृणमुलचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्य करीत त्यांच्या घरांवर हल्ले केले असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
भाजपचे जिल्हा अध्यक्ष बापी गोस्वामी यांनी सांगितले की घोष यांचा मृतदेह घरी आणण्यात आल्यानंतर तेथे जमलेल्या तृणमुलच्या कार्यकर्त्यांनीच भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा व ती पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे.