कोची : पश्चिम कोडीयाथूर आणि वेनगेरी येथे प्रत्येकी एका पोल्ट्रीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या मरण पावल्या. त्यामुळे केरळच्या पशु संवर्धन विभागाने तातडीने बैठक घेतली. मात्र ही साथ नियंत्रणात असून घाबरण्याची गरज नसल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. 2016 मध्ये या साथीने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर या साथीची लागण झाल्याची ही केरळमधील पहिलीच घटना आहे.
या पोल्ट्रीत 200 कोंबड्या मरण पावल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने वेगाने कार्यवाही केली. कन्नूर आणि भोपाळ येथील प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही मार्गदर्शक सूचना आली नाही. मात्र भोपाळ येथील प्रयोगशाळेने बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट केले आहे, असे पशू संवर्धन विभागाने सांगितले आहे.
देश कोरोना व्हायरसशी लढत असताना, (त्यातही जनावरांना गंभीर आजार होतात) बर्ड फ्लूचे संकट उभे राहीले आहे. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगावी लागणार असल्याचे मानण्यात येत आहे.
ओडिशातील स्थिती
ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात बर्ड फ्लूची बाधा झाल्याचे लक्षात येताच त्या पोल्ट्रीतील सर्व कोंबड्या कापून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने वेगाने हालचाली केल्या होत्या. जानेवारीत ही घटना घडली होती. मात्र त्यानंतर तेथे बर्ड फ्लूची घटना घडली नाही.