नवी दिल्ली- गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या करण्याच्या प्रकरणातील ११ आरोपींना तुरूंगातून सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. आता या प्रकरणातील आरोपींना पुन्हा शरण यावे लागणार आहे. मात्र ११ पैकी ९ आरोपी बेपत्ता असल्याचे सांगितले जाते आहे. ते कुठे आहेत आणि काय करत आहेत याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनाही नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आरोपी किंवा दोषींची सुटका रद्द करण्याचा निर्णय कालच न्यायालयाने दिला. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी दोषींच्या राधिकापूर आणि सिंगवाद या गावांकडे धाव घेतली. मात्र आरोपींच्या घरांना कुलूप लावलेले होते. त्यांचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. गोविंद या आरोपीचे वडिल अक्खमभाई चतुरभाई रावल यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, हा राजकीय सूडाचा प्रकार असून त्यांचा मुलगा निर्दोष आहे. गोविंद आठवडाभरापूर्वीच घरातून निघून गेला आहे. त्याने अयोध्येतील मंदिर प्रतिष्ठानात (राम मंदिर) सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. काहीच न करण्यापेक्षा आणि इकडे तिकडे भटकण्यापेक्षा हे सेवा करणे चांगले. असेही तुरूंगातून सुटका झाल्यापासून तो काहीच करत नव्हता.
रावल यांच्या म्हणण्यानुसार तुरूंगात जाणे काही वाईट गोष्ट नाही आणि त्यांचा मुलगा अवैधपणे तुरूंगातून बाहेर आला होता असेही नाही. कायदेशीर प्रक्रियेद्वारेच त्याची सुटका झाली होती. आता कायद्यानेच त्याला पुन्हा तुरूंगात जाण्यास सांगितले आहे तर तो पुन्हा आत जाईल. तो २० वर्षे तुरूंगात राहीला आहे त्यामुळे आमच्या कुटुंबासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. गोविंदच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्मावर विश्वास असणारे ते कुटुंब आहे व ते गुन्हा करूच शकत नाहीत.
याच प्रकरणातील दाहोड येथील एक आरोपी राधेशाम शहा गेल्या पंधरा महिन्यांपासून घरी नाही. दरम्यान, आपल्याला आपल्या मुलाबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्याचे पिता भगवानदास शहा यांचे म्हणणे आहे. राधेशाम त्याची पत्नी आणि मुलाला सोबत घेऊन निघून गेला आहे. प्रदीप मोढीया हा आणखी एक आरोपी गायब आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते आता कोणालाच सापडणार नाहीत. ते सगळे अगोदरच पळून गेले आहेत. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता दोषींच्या घराबाहेर एक एक पोलीस हवालदार उभा करण्यात आला आहे. दोषींच्या कुटुंबांशी कोणी काही गैरवर्तणूक करू नये यासाठी प्रामुख्याने ही खबरदारी घेतली गेली आहे.