नवी दिल्ली : महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यांमध्ये अडकलेल्या बिहारच्या कामगारांना परत आणण्यासंदर्भात बिहार सरकारने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाडी सोडण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील माहिती बिहारमधील एका मंत्र्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
लॉकडाउननंतर वेगवगेळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना स्वत:च्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याच्या मागण्या वेगवेगळ्या राज्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केल्या आहेत. तेलंगण राज्याच्या मागणीच्या आधारावर आज हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली.
२५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. या वृत्तानंतरच बिहारमधील मंत्र्याने केंद्राकडे अशाच विशेष रेल्वे गाड्या महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यामधून बिहारमध्ये सोडण्यात याव्यात अशी मागणी केल्याची माहिती दिली आहे.