मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं नाव जोडलं गेलेल्या पत्राचाळ प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या राऊत हे या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. अशात पत्राचाळ प्रकरणी समोर आलेल्या या अपडेटमुळे संजय राऊत यांना दिलासा मिळणार आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी आता 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राऊत हे जामिनावर बाहेर असल्यामुळे ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला होता. त्यानंतर आज राऊत हे स्वतः सत्र न्यायालयात हजर झाले होते. तसेच सारंग आणि राकेश वाधवान यांना कोर्टात हजर करण्यासाठी ईडीनं जेल प्रशासनाला विनंती केल्याची माहिती देखील ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिल्याचे समजते.
ईडीने केली होती मोठी कारवाई
पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीनं एप्रिल महिन्यात टाच आणली आहे. यांच्या 31.50 कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती अर्थात इमारती ईडीनं जप्त केल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणते नवीन खुलासे होणार हे पाहणे महत्वाचे आहे.
याच प्रकरणात राऊत यांनी भोगलाय तुरुंगवास
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हा राऊत आर्थर रोड कारागृहात होते. मात्र नंतर राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.