मुंबई – महाराष्ट्रातून मणिपुरला रेल्वेच्या सहा वॅगन्स भरून कांदा पाठवण्यात आला आहे. मध्य रेल्वेने नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथून कांद्याने भरलेल्या सहा वॅगन्स मणिपूरला पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
मणिपूरमधील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे तेथे जीवनावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, ईशान्य फ्रंटियर रेल्वेने रविवारी राज्याच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने हिंसाग्रस्त मणिपुरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या पहिल्या मालगाड्या पाठवल्या.कांदा वाहून नेणारी ही गाडी सोमवारी मणिपूरच्या तामेंगलॉंग जिल्ह्यातील खोंगसांग रेल्वे स्थानकावर पोहोचली. एका स्थानिक व्यापाऱ्याने अंकाई ते खोंगसांग पर्यंत वॅगन्स बुक केल्या होत्या.
एका रेल्वे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, 22 वॅगन्स चांगसारी स्थानकावर पोहोचल्यानंतर, उत्तर सीमा रेल्वेने कांद्याने भरलेल्या सहा वॅगन्स वेगळ्या केल्या आणि त्या दुसऱ्या मालगाडीला जोडल्या, ज्यात बटाटे, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तू मणिपूरला नेल्या जात होत्या.