नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांत आयकर विभागाने आयकर विवरणपत्र न भरल्याबद्दल तसेच विवरण पत्रांमध्ये कमी उत्पन्न दाखवल्याबद्दल सुमारे एक लाख लोकांना नोटीसा जारी केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली.
आयकर विभागामार्फत इतक्या मोठ्या प्रमाणात नोटीसा का जारी केल्या जात आहेत असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की दोन श्रेणींच्या आधारे या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.
ज्यांनी आपले उत्पन्न कमी दाखवले आहे किंवा आयकराची विवरण पत्रेच सादर केलेली नाहीत अशा प्रकरणात या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. आयकर दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, आयकर कायद्यानुसार, अधिकारी मागच्या सहा वर्षांपर्यंतचे विवरण पत्रांतील मूल्यांकन पुन्हा उघडून बघू शकतात आणि त्यावर कारवाई करू शकतात. या नोटीसा अविचारीपणे जारी केल्या गेलेल्या नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या की या आधी आयकर विभागाचे अधिकारी दहा वर्षांपर्यंतची प्रकरणे पुन्हा उघडून त्यावर कारवाई करीत होते. पण आम्ही हा कालावधी सहा वर्षांपर्यंत खाली आणला आहे. सहा वर्षापुर्वीच्या कोणत्याही प्रकरणात आयकर विभागाकडून कोणतीही कारवाई आता केली जाणार नाही असेही निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. सीतारामन यांनी नागरिकांवर अतिरिक्त कर न लादता महसूल वाढवल्याबद्दल प्राप्तिकर विभागाचे कौतुक केले.
गेल्या 3-4 वर्षांत कर दर वाढला नाही परंतु महसूल वाढत आहे आणि महसुलाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. आयकर विभागाची कार्यक्षमता सुधारली आहे आणि अर्थव्यवस्था अधिकाधिक औपचारिक होत आहे, असेही त्या म्हणाल्या.