औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे याबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोप यांना सुरुवात झाली आहे. आता राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे उद्या जाहीर सभा होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आहे. तत्पूर्वी आज सकाळी राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या सभेला कितीही विरोध झाला किंवा कितीही केसेस झाल्या तरी त्या आम्ही अंगावर घेण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.
राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी अटीशर्थींसह मान्यता दिली आहे. त्यात आवाजाची मर्यादाही आहे. 50 ते 55 डेसिबलपर्यंत आवाज असावा असे पोलिसांनी म्हटले आहे. हे पाळणं शक्य आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर तेवढं ठीक आहे. आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत. तुम्हाला आधीही बोललो आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
काही पक्षप्रवेश होते आणि सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. मी समाधानी आहे. माझ्या सहीत सगळ्यांना राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता आहे. ही सभा ऐतिहासिक होईल एवढे नक्की, असे अमित ठाकरे यांनी सांगितले. बाकीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही. आमचे वरिष्ठ नेते बोलतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.अमित ठाकरे यांनी आज सभा स्थळी जाऊन तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली.
राज ठाकरेंची ही सभा रेकॉर्ड ब्रेक होईल. पोलीस त्यांचं काम करतील. आम्ही आमचं काम करू. आम्ही त्यांनी घातलेल्या शर्थीचं काटेकोरपणे पालन करणार. राज जी भूमिका पाळत असतात तशी ती अंमल बजावणी करतात, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले. शिवसेनेच्या पालिकेच्या कारभाराला शिवसेना कंटाळली आहे. आम्हाला देखील सभा यशस्वी करायची आहे. सभा शांततेत होईल. आम्ही कार्यकर्त्यांना शांततेत येण्यासाठी सांगितले आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड होता आता नाही, असा चिमटाही सरदेसाई यांनी काढला.