सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने धक्कातंत्राचा वापर करत काही दिग्गजांचा पत्ता कट केला. मात्र, त्याचे कारण गुलदस्त्यातच ठेवले. आता त्याविषयीचा गौप्यस्फोट करताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या सर्व्हेकडे बोट दाखवले आहे.
एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश मेहता या आजी-माजी मंत्र्यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यांना तिकीट का देण्यात आले नाही याबाबत भाजपकडून काहीच स्पष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले. अखेर कुणाचे नाव घेण्याचे टाळून मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे बोलताना त्या तर्क-वितर्कांवर पडदा टाकणारे वक्तव्य केले.
तिकीट वाटप करण्याआधी भाजपने एक सर्व्हे केला. त्याआधारे प्रस्थापितविरोधी किंवा विद्यमानविरोधी भावना असलेल्या मतदारसंघांमध्ये काही इच्छुकांना पक्षाने तिकीट नाकारले, असे त्यांनी म्हटले. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या ज्येष्ठ नेत्यांना आगामी काळात पक्ष नवी जबाबदारी देऊ शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कल्याणकारी योजना आणि शेतीविषयक कामांवर कठोर मेहनत घेतली. त्यामुळे सत्तारूढ महायुती विधानसभेच्या 288 पैकी 220 हून अधिक जागा जिंकेल, या भाजपकडून व्यक्त होणाऱ्या विश्वासाचा त्यांनी यावेळी पुनरूच्चार केला.