अहमदनगर : संपूर्ण राज्यासह देशाची चिंता वाढवणारी ही बातमी समोर येत आहे. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. सध्या राज्यात 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झाने बाधित रुग्णांची संख्या आहे.
एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल प्रलंबित आहे. तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून मृत्यू झालेला तरुण नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता.
H3N2 इन्फ्लुएन्झाने मृत्यू झालेला तरुण मागील आठवड्यात कोकणात फिरायला गेला होता. कोकणातून फिरून आल्यावर तो आजारी पडला होता. त्याला सर्दी, ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आली होती.त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये तो करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान त्याची करोना चाचणी सोबतच H3N2 इन्फ्लुएन्झाची चाचणी करण्यात आली त्यातही तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रातील H3N2 इन्फ्लुएन्झाचा हाच तरुण पहिला मृत्यू असल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार असून फिरायला गेलेल्या सर्वांची चाचणी केली असून त्यांचे अहवाल प्रलंबित असून त्याची प्रतीक्षा केली जात आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाबत चिंता वाढवणारी बाब निर्माण झाली आहे. या घटनेने राज्य सरकारची चिंता वाढणार असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहे. अशातच अहमदनगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.