Big Breaking : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने देशात सर्वच पक्षात जागांबाबत चढाओढ पाहायला मिळत आहे. राज्यातही तीच परिस्थिती असून काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी लोकसभेच्या २५ जागांवर दावा केला आहे. त्यांच्या दाव्यावरून आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे. कारण राज्यातील लोकसभेच्या २३ जागा लढवणार शिवसेना (ठाकरे गट)असल्याचा निर्धार केला असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या 25 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे.याविषयी बोलताना राऊत यांनी, “काँग्रेसने 25 नव्हे तर सर्व 48 जागा लढवाव्या. आम्ही मात्र आमच्या 23 जागा लढवण्यावर ठाम आहोत. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल, राज्यातील नाही, असे म्हणत त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा समाचार घेतला,
पुढे बोलताना त्यांनी,”महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही, जो निर्णय घेऊ शकेल, जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. सातत्याने त्यांना दिल्लीला विचारावं लागतं. त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करु, आम्ही 23 जागा लढवणारच, असे म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा झाली. आम्ही सर्वांनी एकत्र बसून महाराष्ट्रातील राजकारण आणि जागावाटपाबाबत चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं ते आम्हालाच माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत होईल, असे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.
संजय राऊत यांनी यावेळी, “तारीख पे तारीख तर सुरूच राहील, जेव्हा आमची वेळ येते त्यावेळी तारीख पे तारीख सुरू राहते. सर्वात मोठा गुन्हा तर या महाराष्ट्रात झाला आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील आमदार तोडून, फोडून, मोडून सरकार तयार केलं आहे. ते बेकायदेशीर आहे, याबाबत बोला, इतर बाबतीत बोलू नका.”, असे म्हटले.