नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी माहिती दिली आहे. आम्ही झुकून सामना करणार नाही. तसेच, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
गांधी परिवाराविरोधात ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होत आहे. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही… छाती ठोकून लढणार.”
तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप करत, “यापूर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजपा राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्याच्याकडून आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर चौकशी करण्यात आली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला.