पाटणा – ज्येष्ठ निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. प्रशांत किशोर बिहार दौरा करणार आहे. बिहारचा दौरा केल्यानंतर प्रशांत किशोर 2 ऑक्टोबरपासून चंपारण येथून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. प्रशांत किशोर वैशालीच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर बिहारला पोहोचले आहेत. यादरम्यान प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे ते म्हणाले,’ते काँग्रेससोबत कधीच काम करणार नाहीत. काँग्रेसने माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब केल्याचा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.
ते पुढे म्हणाले,’काँग्रेस पक्ष सुधरत नाही, काँग्रेस पक्ष स्वतः बुडत आहे आणि आम्हालाही बुडवेल. 10 वर्षात आम्ही 2017 मध्ये फक्त एकच निवडणूक हरलो. काँग्रेसने आमचा ट्रॅक रेकॉर्ड खराब केला, म्हणूनच आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करणार नाही.’
प्रशांत किशोर यांनी असेही सांगितले की,’ 2017 मध्ये पंजाबच्या निवडणुका जिंकल्या. 2019 मध्ये, जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत आंध्र प्रदेशमध्ये विजय मिळवला. 2020 मध्ये दिल्लीत केजरीवाल यांच्यासोबत एकत्र विजय मिळवला. 2021 मध्ये तामिळनाडू आणि बंगाल जिंकले. त्यापैकी एका निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, असं किशोर म्हणाले.
सुरू झाली ‘जन सूरज यात्रा’
प्रशांत किशोर यांनी बिहारमधील हाजीपूर येथून ‘जन सूरज यात्रा’ सुरू केली आहे. येथील यात्रेची माहिती देताना ते म्हणाले की, वैशाली ही लोकशाहीची भूमी आहे, त्यामुळे जन सूरज यात्रा सुरू करण्यासाठी हे सर्वात योग्य ठिकाण आहे. बिहारमध्ये नवी राजकीय व्यवस्था निर्माण करण्याच्या विचारातून हा प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीपर्यंत मला भेटणाऱ्यांची संख्या 18 हजार होती, ती वाढून 60 हजार झाली आहे. हे असे लोक आहेत ज्यांनी स्वतः भेटण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता किंवा आमच्या टीममधील लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता.