लातूर ( Archana Patil joins BJP) – लोकसभा निवडणुकीदरम्यान, देशासह राज्यात काॅंग्रेसला बडे नेते पक्ष सोडून गेल्याचे अनेक धक्के बसले. त्यातच आता काॅंग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. लातूर लोकसभा मतदारसंघात चाकूरकर कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. (Big blow to Congress in Latur: Congress leader Shivraj Patil’s daughter-in-law Archana Patil joins BJP)
मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणले –
पक्ष प्रवेशानंतर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात अनेक मोठी कामे केलीत. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे देशाची प्रगती झालीय. मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणले. त्यामुळे राजकारणात येण्यापासून घाबरणाऱ्या महिलांना आता राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयाने प्रभावित होऊनच मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, असे अर्चना पाटील म्हणाल्या.
मी सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज यांचा प्रभाव –
मी सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज यांसारख्या नेत्यांना जवळून पाहिले आहे. त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचा त्यांच्या कार्याचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठी राहू द्या, असेही अर्चना पाटील म्हणाल्या.
शिवराज पाटील यांनी मूल्यावर आधारीत राजकारण केले – देवेंद्र फडणवीस
यावेळी मीडियाशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवराज पाटील चाकूरकर यांनी मूल्यावर आधारीत राजकारण केले आहे. त्यांनी अत्यंत चांगले काम केले. समाजकारणात त्यांचा मोठा वाटा आहे, असा गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. फडणवीस यांनी काॅंग्रेस नेते शिवराज पाटील यांची स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
लातूरमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय झटका –
गेल्या महिन्यात 13 फेब्रुवारीला काॅंग्रेस नेते अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 27 फेब्रुवारीला लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आज डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला. लातूर मध्ये एका महिन्यात 2 बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने काॅंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ आणि जिल्हा या दोन्हीमध्ये चाकूरकर कुटुंबीयांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. आता चाकूरकर परिवार भारतीय जनता पक्ष सोबत गेल्यानंतर मराठवाड्यामध्ये केवळ विलासराव देशमुख यांचे पुत्र काँग्रेस सोबत राहणार, असेच चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
शिवराज पाटील कोण आहेत ?
शिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व 10वे लोकसभा सभापती आहेत. 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते.
1973 साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. 1980 साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील 6 निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. 2004 साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील 2004 ते 2008 दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.