मुंबई : खरी शिवसेना आमचीच म्हणत ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सध्या संघर्ष सुरु आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर ही लढाई निवडणूक आयोगाकडे गेली. दरम्यान, पक्षचिन्ह आणि नावावरुन ही लढाई सुरु असतानाच ठाकरे गटाला निवडणूक आयोगाककडून मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयागोसमोर आपली बाजू भक्कपणे मांडण्यासाठी ठाकरे गटाने तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्रे जमा केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपुरात यावर भाष्य केले आहे. शिंदे गटाकडून वारंवार आपणच खरी शिवेसना असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा खोडून काढण्यासाठी ठाकरे गटाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रं जमा करण्यास सुरुवात केली होती.
दोन ट्रक भरुन हे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले होते. पण निवडणूक आयोगाने यामधील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद ठरवली आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.
ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकीचा असल्याने ती बाद ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्येच ही प्रतिज्ञापत्रे देणे अपेक्षित होते. नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली आहेत. दरम्यान उर्वरित साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं. “निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचं कोणतंही प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता देणं किंवा चिन्ह देणं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तांनी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, कुणाचे रद्द झालेत, कुणाचे टिकले हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललं आहे,” असे फडणवीसांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने अद्याप आपला अंतिम निर्णय दिलेला नाही. दोन्ही बाजू पडताळून पाहिल्यानंतर आयोग आपला निर्णय देणार आहे. त्यानंतरच ‘खऱी शिवसेना कोण’ आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला मिळणार? या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे.