मुंबई – राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून “अजित पवार’ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.
अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता या सर्व चर्चांना अजित पवार यांनी पूर्ण विराम दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
दरम्यान, अजित पवारांचा हा निर्णय म्हणेज शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्यांमध्ये “दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे’ या सारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.
छगन भुजबळ हे शरद पवारांचे विश्वासू मानले जातात. त्यांना महाविकास आघाडीची सत्ता असताना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. मात्र तरी देखील भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडत आज अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याच प्रमाणे दिलीप वळसे पाटील हे देखील शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र, आता त्यानी देखील पवारांची साथ सोडली आहे.