पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – येत्या शुक्रवारी (दि. ८) महाशिवरात्र असल्याने तरकारी विभागात रताळांची आवक सुरू झाली आहे. ती वर्षीच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आहे. घाऊक बाजारात राज्यातील गावरान रताळींना किलोला दर्जानुसार ३५ ते ३८ रुपये, तर करमाळा भागातून आलेल्या रताळींना दर्जानुसार १४ ते १८ रुपये भाव मिळत आहे. याशिवाय किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० ते ७० रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.
कराड, मलकापूर भागांतून गावरान मागील वर्षी १ हजार पोती रताळींची आवक झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन यंदा २ ते ३ हजार पोती झाली आहे. आवक वाढली असली, तरीही गावरानला मागणी जास्त आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मागील वर्षापेक्षा जास्त दर मिळाला आहे.
गावरान रताळींची आवक कमी
गावरान रताळी चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळीला जास्त मागणी असते. मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गावरान रताळींची आवक वाढली आहे.
तर मागील काही वर्षाचा विचार केल्यास दिवसेंदिवस गावरान रताळींची आवक कमी होत चालली आहे. पूर्वी बीड जिल्ह्यातून आवक व्हायची. मात्र, येथील बाजारापेक्षा मुंबईला जास्त भाव मिळतो. त्यामुळे तेथून आणि कराड भागातून निर्यात होण्याचे प्रमाण वाढले आहे.
करमाळा भागात नवीन बियाणे
करमाळा भागातून येथील बाजारात् मोठ्या प्रमाणात गावरान रताळींची आवक व्हायची. मात्र, यंदा तेथे नवीन बियाणे विकसित केले आहे. बेळगाव रताळींच्या धर्तीवर ही जात विकसित केली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले आहे. बाजारात त्या भागातून तब्बल ४ ते ५ हजार पोती आवक झाली आहे.
मात्र, त्याला गावरानसारखी चव नाही. ती रताळी रंगाने पांढरी असून, साल बारीक आहे. त्याला घाऊक बाजारात किलोस १४ ते १८ रुपये भाव मिळाला आहे. दरम्यान, यंदा कर्नाटक येथून रताळींची आवक झालीच नाही. स्थानिक भागातच चांगला भाव मिळत असल्याने ही स्थिती आहे.
मार्केट यार्डात मागील वर्षीच्या तुलनेत रताळींची दुप्पट आवक झाली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने दर्जेदार मालाला भाव जास्त मिळाले आहेत.- अमोल घुले, व्यापारी, मार्केट यार्ड