शेतकरी, नागरिकांचे म्हणणे : तक्रारींनाही दाखवला ठेंगा
सासवड – पुरंदर तालुक्यातील सोनोरी, माळशिरस, टेकवडी, काळदरी, परींचे, पांगारे, हिवरे, जाधववाडी, दिवे, केतकावळे, नारायणपूर, उदाची वाडी या गावांमध्ये अनेकवेळा बिबट्याचे दर्शन पुरंदरकरांना झाले आहे. याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारी, निवेदने अर्ज देखील केलेले आहेत. मात्र, याकडे पुरंदरच्या वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांसह नागरिकांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याच्या तक्रारी दाखल केल्यानंतर तो खरंच बिबट्या आहे का, असाच प्रश्न पुरंदरच्या वनविभागाकडून शेतकऱ्यांनाच विचारला जात आहे. बिबट्या दिसल्याने घाबरलेले शेतकरी मोठ्या आशेने वनविभागाकडे जातात; परंतु या ठिकाणी कारवाई करायचं सोडून वनविभागाकडून शेतकरी आणि नागरिकांवरच प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे.
या ठिकाणी गस्त घालणे, बिबट्या संदर्भात जनजागृती करणे, सावधानता बाळगण्याचे उपाय सुचविणे, बिबट्याच्या अस्तित्वाविषयीचे फलक लावणे या संदर्भात वनविभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. ज्या भागांमध्ये बिबट्याचा अधिवास आहे, त्या भागांमध्ये वनविभागाकडून रात्रीची गस्त घालणे अत्यंत आवश्यक आहे.
पुरंदर वन विभागाच्या गलथान कारभारामुळे पुरंदरचे शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. पुरंदर तालुक्यात सध्या भारनियमनामुळे ग्रामीण भागात शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री जावे लागते, तसेच ज्या भागामध्ये फळबागा आहे, त्या फळबागांमध्ये फळांची तोडणी मध्यरात्रीच केली जाते, त्यामुळे मध्यरात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना फळे तोडावी लागत आहेत. त्यातच पुरंदर तालुक्यात अधिवास असलेल्या बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे, याची आकडेवारीच वन विभागाकडे उपलब्ध नसल्याने शेतकरी बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत झाले आहेत.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा
सासवड येथील वनविभागाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. या सोबतच तालुक्यात कुठेही वनविभागामार्फत गस्त घालताना आढळून येत नाही. कार्यालयीन कामकाजाच्या वेळी बहुतांश कर्मचारी व वनपरिक्षेत्र अधिकारी देखील कार्यालयात अनुपस्थित असतात, असे आढळून आले आहे. याबाबत विचारले असता- मी तुम्हाला सांगण्यास बांधील नाही, असे उत्तर दिले जाते. वनपरिक्षेत्र अधिकारी कायमच स्थळ पाहणीवर असतील तर नागरिकांनी अधिकाऱ्यांना भेटायचे तरी कधी आणि समस्या मांडायच्या तरी कशा?
पुरंदर तालुक्यात बिबट्यांची संख्या अंदाजे पाच ते सात आहे. या बाबतीत निश्चित संख्या वन विभागाकडे उपलब्ध नसल्यामुळे ती निश्चितपणे सांगता येत नाही.
-जयश्री जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी पुरंदर