ग्रामस्थांनी हटविला रस्त्यावरील राडारोडा
भुलेश्वर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील भुलेश्वर घाटात शनिवारी (दि. 20) रात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी सकाळी ग्रामस्थांनी प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंडळाकडून पाच कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. यात भुलेश्वर घाटाचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, हा घाट सुरुवातीपासूनच पुरंदर व दौंड तालुक्याच्या वन विभागाच्या कात्रीत सापडला असल्यामुळे दोन्ही तालुक्याच्या हद्दीमध्ये हे काम वनविभागाने थांबविले आहे. घाटाचे रुंदीकरण करताना डोंगर सरळ तोडण्यात आल्याने पावसाळयात दरड कोसळत आहेत. पाणी वाहून जाणाऱ्या चारीमध्ये डोंगरातील दगड, माती पडल्याने अनेक ठिकाणी चारी बुजल्या गेल्या आहेत. या परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येते. यामुळे अनेक ठिकाणी घाटरस्ता खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.