मुंबई : भीम आर्मी संघटनेला नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठाने दिला. याबाबत सविस्तर वृत्त असं की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या आक्षेपावरून पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. यानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत २२ फेब्रुवारी रोजी नागपुरातील रेशीम बाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आज भीम आर्मीला सशर्त परवानगी दिली आहे.
अशी आहे न्यायालयाची सशर्त परवानगी
न्यायालयाने भीम आर्मीला परवानगी देताना काही अटी घातल्या असून या अटींचे पालन करू अशा लिखित हमीची मागणी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्याकडे केली आहे. कार्यक्रमादरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक विधान करण्यास तसेच या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव केला असून हा कार्यक्रम दुपारी २ ते दुपारी ५ वाजेपर्यंतच घेण्यात यावा असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
न्यायालयाने घातलेल्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हेगारी कायद्यासह न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणीही कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे.