मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हिंगोली आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निर्णय घेण्यात आले आहेत. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी या पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छूक होत्या.
मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून या मतदारसंघातून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
त्यांनी मध्यंतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासून भावना गवळी या वर्षा बंगल्यावर ठाण मांडून बसल्या होत्या.
मात्र, एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे आता भावना गवळी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.