पुणे – स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणे आणि कालचा, आजचा विचार करण्यापेक्षा उद्याचा विचार करणे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.
भारती हॉस्पिटलमध्ये नवीन 3 टेस्ला एमआरआय मशिन व 128 स्लाईस आणि 32 स्लाईस सी.टी. स्कॅन अद्ययावत सेंटरचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार प्रफुल्ल पटेल, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यावेळी उपस्थित होत्या.
ठाकरे म्हणाले, करोनाच्या संकटात डॉक्टरांनी एखाद्या योद्धाप्रमाणे मोलाची भूमिका बजावली. त्यांचे योगदान समाज कधीच विसरणार नाही. या संकटात भारती हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने जे काम केले ते कौतुकास्पद आहे. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, ग्रामीण भागातील सामान्य आणि गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या अडचणीतून जावे लागते हे डॉ. पतंगराव कदम यानी अनुभवले होते. ते पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ म्हणून त्यांनी एका ध्येयवादातून भारती विद्यापीठाची स्थापना केली. गरजू रुग्णावर माफक दरात उपचार करता यावेत म्हणून भारती हॉस्पिटल उभारले. करोना काळात भारती हॉस्पिटलने ज्या संवेदनशीलतेने काम केले त्याचा अभिमान वाटतो.
डॉ. अस्मिता जगताप म्हणाल्या, आज सुरु झालेले 3 टेस्ला एमआरआय मशिनमुळे रुग्णाचा वेळ वाचणार असून डॉक्टरांना अधिक सुस्पष्ट प्रतिमा प्राप्त झाल्याने रोगाचे निदान करणे सोपे जाणार आहे. लहान मुलांसाठी गरजेच्या असणाऱ्या स्पेशल कॉईल्सची महाराष्ष्ट्रात असलेली वानवा भरून काढण्यासाठी अशी सुविधा भारती हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलेली आहे. भारती हॉस्पिटलचे मेडिकल संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी आभार मानले.