कोलकाता – सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फारसा परिणाम होणार नाही, असे मत भाजप सरकार मधील माजी मंत्री एम जे अकबर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सरकारी प्रशासन हाताळण्याच्या क्षमतेवर या निवडणुकीचा प्रभाव राहील. घटनेतील कलम 370 रद्द करून राज्याचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनाची भरभराट झाली आहे, असे मतही त्यांनी नोंदवले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मोदींनी पहिल्या टर्ममध्ये काही “मूलभूत निर्णय” घेतले आहेत आणि दुसऱ्या टर्ममध्ये ते पुढे चालू ठेवले आहेत.
एम. जे. अकबर हे पत्रकार आहेत आणि त्यांची राजकारणाची सुरवात कॉंग्रेस मधून झाली आहे. त्यांनी नंतर भाजप मध्ये प्रवेश केला. काही काळ ते मोदी सरकार मध्ये मंत्रीही होते. आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, एखाद्याने गरिबांसाठी किती काम केले आहे हे शासनाचे अंतिम, केंद्रीय सत्य आहे. आणि येथेच पंतप्रधान मोदी अन्य सरकारांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. राज्यघटना सांगते की गरिबी दूर करायची आहे आणि ती दूर करण्याचा मोदींचा निर्धार आहे, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसनेही “लोकहितवादी” काम केले आहे, पण हा पक्ष आता स्थीर सरकार देऊ शकेल अशी शंका लोकांच्या मनात आहे. तुम्हाला केवळ उत्तम प्रशासकीय काम करून भागत नाही तर तुम्ही एक स्थीर आणि विश्वासार्ह सरकार देऊ शकाल अशी खात्री तुम्ही पटवून दिली पाहिजे असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाबद्दल ते म्हणाले, सीमेपलीकडील दहशतवादाला कोणीही संपवू शकत नाही, जो आता त्या देशाचे अधिकृत धोरण आहे. त्यामुळे ते संपवण्याची अपेक्षा करणे खूप जास्त होईल. पण जम्मू काश्मीरातील पर्यटन आता खूपच सुधारले आहे असे अकबर यांनी निदर्शनाला आणून दिले.