शिंदे वासुली -आम्ही सुरुवातीपासूनच भामाआसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांबरोबर होतो आणि आजही आहे. खेडच्या लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या भूमिकेमुळे भामाआसखेड आंदोलन चिघळले, असा आरोप आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव घेता माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला.
भामा आसखेड आंदोलनप्रकरणी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोरे यांनी भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांवर झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन मुक्त करा व ठरल्याप्रमाणे एक किमी जलवाहिनेचे काम बंद ठेवा अन्यथा शिवसेना आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांवर झालेला अन्याय व मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे साकडे घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, माजी उपसभापती भगवान पोखरकर, लक्ष्मण जाधव, बिपीन रासकर आदी शिवसेना नेते उपस्थित होते.
भामा आसखेड शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज का पडली? पालकमंत्र्यांच्या बैठकीत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांविरुद्ध भूमिका का घेतली? अशी घणाघाती टीका आमदार मोहितेंवर सुरेश गोरे यांनी केली. माझ्या पाच वर्षांच्या काळात भामाआसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांबरोबर राहून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही शिवसैनिकांनी प्रथम तोडफोड करुन आंदोलन केले. आमच्यावर गुन्हे दाखल झाले.
अनेकवेळा जिल्हा प्रशासन व शेतकऱ्यांचा बैठका घेऊन मध्यस्थीची यशस्वी भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. आताच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे आंदोलन चिघळले. आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकले गेले हे लोकप्रतिनिधींमुळेच.
मुख्यमंत्र्यांच्या दरबारी प्रश्न मांडणार
शिवसेना भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांबरोबर असून प्रकल्पग्रस्तांना बरोबर घेऊन पालकमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन पुनर्वसनाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडविले जातील. जिल्हा प्रशासन चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची शासनाची दिशाभूल करत आहे. खासबाब हेक्टरी 15 लाख रुपये अनुदान 900 शेतकऱ्यांना वाटप करावे, न्यायालयात गेलेल्या व जमीन वाटपाचा आदेश झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या ताब्यातील जमीनीचा वाटप करावा या व अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे.
एजंटच एजंटला ओळखतो
महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी असूनही खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच भामाआसखेड आंदोलन पेटले असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांनी केला. काही शेतकऱ्यांवर एजंट असल्याचा आरोप होत असला तर त्यांची चौकशी लावा, पण बाकी शेतकऱ्यांवर अन्याय का? “एजंटच एजंटला ओळखतो’, अशी टिका गोर यांनी केली.