पाटणा – बिहार मध्ये सत्तारूढ आघाडीतील लोकजनशक्ती पार्टी आणि जेडीयु यांच्यात आधीच तणाव असताना आता त्यात माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला सत्तारूढ आघाडीत स्थान दिल्याने जेडीयु आणि लोकजनशक्ती पक्षातील दरी आणखीनच वाढली आहे. तशातच आम्ही लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात आमचे उमेदवार रिंगणात उतरवू असा इशारा मांझी यांनी दिल्याने लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.
बिहारमध्ये रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टी भाजपचा मित्र पक्ष असली तरी या पक्षाला बिहारच्या सरकार मध्ये नितीशकुमार यांनी स्थान दिलेले नाही. आधीपासूनच लोकजनशक्ती पक्षाचे नेते खासदार चिराग पासवान हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. तशातच नितीशकुमार यांनी मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा या पक्षाला आपल्या आघाडीत स्थान दिले आहे. त्यामुळे पासवान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्याला प्रत्युत्तर देताना मांझी यांनी म्हटले आहे की आम्ही नितीशकुमार यांचे हात बळकट करण्यासाठी आघाडीत आलो आहोत. आम्हाला उमेदवारी किती मिळणार याविषयात स्वारस्य नाही. पण तरीही चिराग पासवान आगपाखड करीतच राहणार असतील तर आम्ही लोकजनशक्ती पक्षाच्या विरोधात आमचे उमेदवार उभे करू. लोकजनशक्ती पक्षाने जेडीयुच्या विरोधात मैत्रीपुर्ण लढत देण्याचा विचार सुरू केला आहे.
त्यांनी जेडीयुच्या विरोधात उमेदवार उभे, केले तर आम्हीही लोकजनशक्ती पक्षाच्या विरोधात उमेदवार उभे करू असा इशारा मांझी यांच्या पक्षाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपचा समावेश असलेल्या या सत्तारूढ आघाडीत जेडीयु, भाजप, लोकजनशक्ती पार्टी आणि हिंदुस्तान अवामी मोर्चा या चार पक्षांची मोट कशी बांधायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.