तांत्रिक अडचणींवर लवकरच मार्ग काढू : मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे आश्वासन
आळंदी – महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र आळंदीला गेली दोन वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. इंद्रायणी नदीतील प्रदूषणामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यधिकारी समीर भूमकर यांनी दोन वर्षापूर्वीच घेतला होता; परंतु आता भामा आसखेड प्रकल्पातून आठ दिवसांपासून आळंदी शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी आळंदीकरांकडून होत आहे.
सोमवारी (दि. 21) दुपारी नगर परिषद सभागृहात बैठक पार पडली. आळंदीला एक दिवसआड पाणी का येत आहे? यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या काय अडचणी आहेत? हे समजून घेण्यासाठी भाजप अध्यात्मिक विकास आघाडीचे हभप संजय महाराज घुंडरे आणि हभप चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा) यांच्या पुढाकाराने आळंदीतील आजी-माजी पदाधिकारी आणि नागरिक यांच्या समवेत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, पाणी पुरवठा विभागप्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, दत्तात्रय सोनटक्के यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, बबन कुऱ्हाडे, शारदा वडगावकर, नंदकुमार कुऱ्हाडे, नगरसेवक सचिन गिलबिले, अजित वडगावकर, सुरेश घुंडरे, पंडित महाराज क्षीरसागर, बाळासाहेब पठारे, आत्माराम महाराज शास्त्री, पोपट वडगावकर, ज्ञानेश्वर गुळुंजकर तसेच अनेक महाराज मंडळी आणि आळंदीकर नागरिक यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जे काही पाणी योजनेचे काम आळंदी शहरात झालेले आहे ते संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे चर्चेतून यावेळी दिसून आले. यावेळी नगरपरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात योग्य तो सकारात्मक सुसंवाद नसल्यामुळे ही कोट्यवधी रुपयांची योजना फोल ठरत असल्याचे यावेळी चर्चेतून बोलताना दिसून आले. तसेच आळंदी शहरात अनेक अनधिकृत नळजोड असल्याचे व आळंदी हद्दीबाहेरील काही ठिकाणी पाणीपुरवठा केला जात असल्याचं यावेळी नगरसेवक सचिन गिलबिले यांनी चर्चेतून दाखवून दिले.
संजय घुंडरे आणि चैतन्य महाराज लोंढे म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन आळंदीकर यांच्या वतीने वरिष्ठ पातळीवर हा आळंदीतील मूलभूत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल.
आळंदी शहराला रोज पाणी पुरवठा व्हावा अशी इच्छा असूनही पाणी वितरण व्यवस्थेतील काही तांत्रिक अडचणीमुळे एक दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर लवकरच मार्ग काढू. शक्य झाल्यास लवकरात लवकर नागरिकांना रोज कसा पाणीपुरवठा होईल याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
-अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी