सातारा -करपेवाडी (ता. पाटण) येथे साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या भाग्यश्री माने या महाविद्यालयीन युवतीच्या खून प्रकरणाने नवे वळण घेतले असून याप्रकरणी तिच्या आजीसह दोन मांत्रिकांसह चौघांना पाटण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
फुलसिंग सेवू राठोड (रा. ऐनापूर तांडा, जि. विजापूर), विकास ऊर्फ विक्रम तोळाराम राठोड (रा. नऱ्हेगाव ता. हवेली), रंजना लक्ष्मण साळुंखे (रा. तळमावले, ता. पाटण), कमल आनंदा महापुरे (रा. खळे, ता. पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे असून संशयितांनी गुप्तधनाच्या आमिषापोटीच भाग्यश्रीचा गळा घोटल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पाटणचे उपअधीक्षक विवेक लावंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार उपस्थित होते. याबाबत अजयकुमार बन्सल यांनी दिलेली माहिती अशी की, करपेवाडी (ता.पाटण) येथील भाग्यश्री माने ही युवती 21 जानेवारी 2019 रोजी महाविद्यालयात गेली होती. मात्र, ती परत घरी न आल्याने नातेवाइकांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर काही दिवसांनी एका उसाच्या शेतात भाग्यश्रीचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. ढेबेवाडी पोलिसांनी भाग्यश्रीच्या वडिलांना अटक करून तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो एक संशयित वगळता पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने तत्कालीन अधिकाऱ्यांनी तपास बंद केला होता.
भाग्यश्रीच्या मारेकऱ्यांचा कर्दनकाळ असलेली त्या गुन्ह्याची फाइल गेली कित्येक वर्षे पाटण उपअधीक्षक कार्यालयात न्यायाच्या प्रतीक्षेत होती. त्यानंतर अनेक अधिकारी बदलले पण त्या फाइलवरील धूळ कोणाच्या नजरेस पडली नाही. मात्र, ढेबेवाडी पोलीस ठाण्याला लाभलेल्या संवेदनशील अधिकाऱ्याच्या मनाला भाग्यश्रीच्या खून प्रकरणाची सल लागली अन् गुन्ह्याची उकल झाली. पकडलेल्या संशयितांनी दिलेली माहिती ऐकून खाकी वर्दीतील पोलिसांना घाम फुटला होता. मृत भाग्यश्रीची आजी रंजना साळुंखे हिला देवर्षीपणाचा नाद असून ती गुप्तधनाच्या शोधात होती. त्यामुळे महापुरे नावाच्या महिलेने रंजना यांची इतर संशयितांसोबत ओळख करून दिली. संशयितांनी मिळून रंजना यांना गुप्तधन मिळावे यासाठी करपेवाडीत एका पडक्या घरामागे यज्ञ करून कुमारीका मुलीचा बळी देण्याचे फुलसिंग याने सांगितले. त्यानुसार दि. 21 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी महाविद्यालयातून घरी आलेल्या भाग्यश्रीला आजी असलेल्या रंजनाने आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे असल्याचे सांगून करपेवाडीत ठरलेल्या ठिकाणी नेले.
तिथे आधीच असलेल्या इतर संशयितांनी यज्ञ करून ते बळीची वाट पाहत बसले होते. रंजना तिथे भाग्यश्रीसह पोहचल्यावर फुलसिंगने अंगारा सांगून बेशुद्धीचे औषध तिच्या नाकाला लावल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर रंजना व महापुरे हिने भाग्यश्रीचे पाय धरले तर फुलसिंगने तिचा गळा चिरून पूजा झाल्याचे सांगितले. खुनासाठी वापरलेला सुरा रंजना हिने तर फुलसिंग याने भाग्यश्रीचा मृतदेह ऊसाच्या शेतात टाकून दिल्याची कबुली दिली.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोऱ्हाटे, उपअधीक्षक विवेक लावंड, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, अंमलदार साबीर मुल्ला, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, संकेत निकम, दीपाली यादव, शकुंतला सणस, यशोमती काकडे तसेच पाटण उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार हणमंतराव पाटील, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिक पाटील, संग्राम बाबर यांनी ही कारवाई केली.
पांढऱ्या पायाची म्हणून दिला बळी
भाग्यश्रीच्या आईची आई असलेली रंजना गुप्तधनाच्या नादात पूर्ण वेडावली होती. भाग्यश्री पाढंऱ्या पायाची असल्याने कुटुंबाची प्रगती होत नसल्याचे टोमणे ती नेहमी मारत होती. दरम्यान, कुमारिका मुलीचा बळी देण्याचे फुलसिंग नावाच्या देवर्ष्याने सांगितले होते. त्यामुळे रंजनाने भाग्यश्रीचा काटा काढण्याचे ठरवून तिचा बळी देत देवर्षाची मागणी पूर्ण तर केलीच. पण कुटुंबाच्या प्रगतीला अडसर ठरत असल्याच्या गैरसमजातून भाग्यश्रीचा काटा काढल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
संवेदनशील संतोष पवारांनी भाग्यश्रीला न्याय दिला
भाग्यश्रीचा खून झाल्यानंतर याप्रकरणाशी थेट संबंध नसलेल्या तिच्या वडीलांना अटक करून तत्कालीन तपासी अधिकाऱ्यांपासून ते एसपींनी धन्यता मानली होती. त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी तर भाग्यश्री खून खटल्याच्या फाईलवरील धूळ झाडण्याची तसदी पण घेतली नव्हती. मात्र, नुकताच काही महिन्यांपूर्वी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचा चार्ज घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी फाईल बाहेर काढली. त्यानंतर बारीक अभ्यास करून मारेकऱ्यांना गजाआड करून भाग्यश्रीला न्याय दिला.